Type Here to Get Search Results !

स्व.विनायकराव मेटे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर


कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर)राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार स्व.विनायकराव मेटे यांना जाहीर झाला आहे. मंगळवार दि.३ सप्टेंबर (आज) रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्व.विनायकराव मेटे यांच्या पत्नी हा पुरस्कार स्विकारणार आहेत.

     स्व.विनायकराव मेटे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर समाजाच्या कल्याणासाठी अखंड झटणारे एक खऱ्या अर्थाने लोकनेते होते. समाजाच्या विकासासाठी त्यांची असलेली निस्सीम तळमळ आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय हे नेहमीच प्रेरणादायी ठरले आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघातून सामाजिक व राजकीय जीवनास सुरुवात करणारे स्व.विनायकराव मेटे साहेबांनी स्व.अण्णासाहेब पाटलाच्या विचारांनी प्रेरित होत मराठा आरक्षण विषय सातत्याने लावून धरले. १९९६ मध्ये विधान परिषद सदस्यपदी त्यांची प्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर पाच वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी विधान परिषदेत काम केले. विधिमंडळात मराठा आरक्षणासह धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी आवाज उठवला,यासोबतच प्रथमच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विधिमंडळात आवाज उठवला.  अवघ्या हिंदुस्थानचे दैवत असलेले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारकाची संकल्पना मांडून त्याचा अविरत पाठपुरावा केला. मागासवर्गीय तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मागासवर्गीय औद्योगिक संस्थांचे प्रश्न विधानभवनात मांडले. तसेच मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च व परदेशी शिक्षणाकरिता विद्या वेतन व मार्गदर्शनाकरिता सारथी या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेची संकल्पना मांडली व त्याद्वारे असंख्य विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला.पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.अशा संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचा मराठा आरक्षणाच्या बाबतीत आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुंबईकडे जात असताना दुर्दैवी निधन झाले. उभ्या हयातभर मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मेटे साहेबांचा शेवटही मराठाआरक्षणासाठीच झाला. समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने राज्याला आणि देशाला एक नवा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या योगदानाची आठवण कायम आपल्या हृदयात जिवंत राहील.आज त्यांच्या पश्चात त्यांचा हा सन्मान होणार आहे.त्यांच्या पत्नी शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ.ज्योती विनायकराव मेटे या हा पुरस्कार स्विकारणार आहेत असे शिवसंग्राम रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश सावंत ह्यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर