विविध शासकीय योजनातर्गत विहीरींच्या अनुदानात वाढ
रायगड जिमाका दि. १२: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत निकष सुधारुन विहीर, वीज जोडणी, पंपसंच आदींसाठी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसुचित जाती, जमातींच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावणे हा उद्देश समोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी कृषि विभाग, रायगड जिल्हा परिषद अलिबाग मार्फत करण्यात आली आहे.
या योजनांतून शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच आदी विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येते. सन २०२४-२५ आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांना घटकांच्या अनुदानात वाढीव लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये योजनेतंर्गत विहीरींचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता ४लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. इतर बाबीसाठी दुप्पट अनुदान वाढविले आहे. त्यामध्ये विहीर दुरुस्ती १ लाख, सतत प्लास्टीक अस्तरीकरण रु. २ लाख, इनवेल बोअर रु. ४० हजार, वीज जोडणी आकार रु. २० हजार, पंपसंच रु. ४० हजार, तुषार सिंचन रु. ४७ हजार, ठिबक सिंचन रु. ९७ हजार यंत्रसामुग्री रु. ५० हजार, पिकीसी/एचडीपीई पाईप रु. ५० हजार, परसबागेसाठी रु. ५ हजार, विंधन विहिरींसाठी रु. ५० हजार अनुदान केले आहे.
त्यामध्ये पूर्वी असलेली रु. १,५०,०००/- उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आली आहे व नवीन विहीरींसाठी असणारी १२ मी खोलीची व दोन सिंचन विहीरीमधील ५०० फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत जसे अर्जदार अनुसूचित जाती/नवबौद्ध/अनुसुचित जमाती प्रवर्गातील असावा. त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८अ उतारा असणे आवश्यक आहे. जमीनधारणा ०.४० हे, ते ६.०० हे. पर्यंत मर्यादित असावी.शेतकऱ्यांनी वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Login या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. सदर योजनेतंर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकृतीपासून लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची सुविधा पोर्टलद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एकत्रित संगणकिय सोडत पद्धतीने लाभार्थी निवडण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या